एक महिन्याचा अल्टिमेटम
भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार हक्कासाठी
ओवळे फाटा येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लाक्षणिक काम बंद आंदोलन लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या साक्षीने झाले.
प्रकल्पग्रस्तांच्या मागील आंदोलनांचा अनुभव घेत या आंदोलनावेळी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करावा लागला होता.
आमदार महेश बालदी, नंदराज मुंगाजी यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांच्या ५० भूमिपुत्रांनी विमानतळ कामाची पाहणी करून काम बंद असल्याची खात्री केली.
रखरखत्या उन्हात या आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, कॉम्रेड भूषण पाटील, राजाराम पाटील, संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, समितीचे खजिनदार जे. डी. तांडेल, दशरथ भगत, रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, राजेश गायकर, दीपक पाटील, उत्तम कोळी, सुनील पाटील, किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, अमर पाटील, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, प्रवीण पाटील, संतोष शेट्टी, विकास घरत, नगरसेविका दर्शना भोईर,चारुशीला घरत, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, प्रमिला पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, कुंडेवहालचे सरपंच सदाशिव वास्कर, विजय घरत, गोवर्धन डाऊर, दगडू गायकवाड, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मे झाले तसे दिबांच्या नावासाठी १०५ हुतात्मे द्यायला तयार आहोत. पुढील २४ तारखेला पुन्हा आंदोलन करणार आहोत त्याची रणनीती येत्या १० दिवसात जाहीर करू आणि त्याच्यापुढची आंदोलने यशस्वी होईपर्यंत तीव्र अति तीव्र स्वरूपात होतील त्याचबरोबर येत्या काळात पाचही जिल्ह्यातील एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केल.
दिबासाहेबांचे नाव आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विमानतळाचे काम बंद पाडण्याची भूमिका घेऊन आपण सर्व आलो आहोत. सिडकोला माहित होते काम बंद नाही केले तर भूमिपुत्र आंदोलक आक्रमक होईल आणि तोच धसका घेऊन विमानतळाचे काम बंद केले. ज्या स्तरावर आंदोलन होईल त्या वेळेला पुढे जाण्यासाठी युवा आणि महिला सरसावले आहेत.
सर्वपक्षीय कृती समिती आणि २७ गाव समिती दिबासाहेबांचे नाव, ७९ गाव तसेच ९५ गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत आहे. सर्व बाबतीत सिडको चालढकल करतेय. चार दिवसापूर्वी झालेल्या सिडको सोबतच्या चार तासाच्या बैठकीत सिडकोचे अधिकारी चर्चेत फक्त वेळकाढूपणा करत होते. किती दिवस चर्चा करायची आता लढाई उत्तरोत्तर तीव्र करायची. कितीही आंदोलने करावी लागली तरी चालेल सिडकोला स्वस्थ बसू द्यायचे नाही. सिडकोच्या कार्यालयात घुसण्याची तयारी करावी लागेल. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते वाया जाऊ द्यायचे नसते. हे दिबांनी शिकवले आहे. जो पर्यंत दिबांचे नाव आणि भूमिपुत्रांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत लढाई अधिकाधिक तीव्र केली जाईल. यापुढे बेमुदत काम आंदोलन; येत्या काळात सिडकोचा चक्का जाम करायचा असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.
भूमिपुत्रांच्या प्रश्नावर सिडकोने डोळे बंद केलेले आहेत, ते उघडण्यासाठी हे आंदोलन उभारले आहे. तळपत्या उन्हात तहान मांडून भूमीपुत्र या आंदोलनात सहभागी झाला आहे. दिबासाहेबांनी संघर्षाचा मूलमंत्र दिला आहे, हि भूमी संघषाची भूमी आहे. प्रकल्पग्रस्तांचे हक्क संघर्षाशिवाय मिळत नाही आणि मिळाले नाहीत. सिडकोकडे एमडी, जॉईंट एमडी, आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत ते फक्त बैठका घेतात पण निर्णय घेत नाहीत. हे अधिकारी दोन तीन वर्षासाठी येतात, आणि नव्याने उजळणी करत बसतात त्यांचा कार्यकाळ संपतो तो पर्यंत त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाशी काही देणे घेणे नसते, त्या जागी पुन्हा दुसरे आले कि पुन्हा सुरुवाती पासून उजळणी सुरु असे ३० वर्षे सिडकोने वेळ मारू पणा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सिडकोचे अध्यक्ष केले. त्यानंतर प्राधान्याने मी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आणि भूमिका घेण्याचे अधिकाऱ्यांना वारंवार सांगत आलो. त्या अनुषंगाने निर्णय झाले. साधारण दीड वर्ष मी अध्यक्ष होतो. या काळात दोन निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्या. वेळ कमी मिळाला पण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक कामे केली. पण आज पुन्हा येरे माझ्या मागल्या करत कारभार करत आहे. सिडकोला वाटतंय कोविड बचावासाठी येईल, सिडको प्रकल्पग्रस्तांना गांभीर्याने घेत नाही सिडकोकडे निर्णय क्षमता राहिली नाही त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही. दिबासाहेबांचे नाव विमानतळाला लागले पाहिजे यासाठी सर्व आंदोलनात भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचा मोठा वाटा आहे. काम बंद पाडणे आपले उद्दिष्ट नाही तर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. सिडको आणि राज्य सरकार भूमिपुत्रांच्या बाबतीत गंभीर नाही हे प्रकर्षाने जाणवत आहे.आज एक दिवस लाक्षणिक आंदोलन केले पण यापुढे बेमुदत काम आंदोलन करावे लागेल आणि येत्या काळात सिडकोचा चक्का जाम करावाच लागेल, असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर व संघर्ष समिती ने एकमताने सिडको व राज्य शासनाला दिला.